सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न....
१५० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग : सामाजिक बांधिलकीचे दर्शन...
पंढरपूर (प्रतिनिधी) : कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पडले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, रोटरी क्लब पंढरपूर , रोटरॅक्ट क्लब पंढरपूर व राष्ट्रीय सेवा योजना, सिंहगड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रेवनील ब्लड बँक, सांगोला यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. वैभव सादिगले, सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख व प्रा. सुमित इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान हेच खरे जीवनदान असून ते सर्वश्रेष्ठ दान आहे. सध्या विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठ्याची कमतरता भासत असताना गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळावी, तसेच तरुणांमध्ये रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करून त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी तरुणांनी अधिकाधिक रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करत वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी रक्तदान अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना व रोटरॅक्ट क्लबच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. गुरुराज इनामदार यांच्यासह रोटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी अध्यक्ष ईश्वरी ताटे, सचिव प्रणव हेंबाडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अविराज साळुंखे, बिलाल शेख, प्रविण नागटिळक, प्रतिक फुंडे, रोहन वागज, रणजित टकले, आदित्य भोसले, स्नेहा कदम, प्रणव वणवे, वैभव व्यवहारे, प्रणव जाधव, ओम ताठे, वैष्णवी देवकर, राज नागणे, काकासो पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरामध्ये १५० हून अधिक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण सादर केले, अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.